रस्त्यावरील वाहतुकीमध्ये सर्वांत जास्त अडसर होतो तो जड आणि मोठ्या वाहनांचा. यांतही विशेषत: ट्रक आणि बस यांच्यामुळे वाहतूक रहदारी वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. असे असताना या बसेस आणि ट्रक रस्त्यांवरून गायब करता आल्या तर? हे कसे शक्य आहे, असे तुम्हाला नक्कीच वाटले असेल. परंतु हे शक्य करण्यासाठी विजेच्या तारेवर चालणाऱ्या बस आणि ट्रक सुरू करण्याचा विचार केंद्र सरकार करत असून, त्या दृष्टीने अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
आत्तापर्यंत आपण केवळ रस्त्यांवरून धावणाऱ्या बस आणि ट्रक पाहात आलो आहोत. परंतु येत्या काही काळात रेल्वेप्रमाणे बस, ट्रकही विजेच्या तारांवर धावताना दिसल्या, तर आश्चर्य वाटायला नको.. हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या बस आणि ट्रक सुरू करण्याबद्दल केंद्र सरकार विचार करत असल्याचे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
अशी आहे योजना – सध्या केवळ रेल्वे आणि इलेक्ट्रिक ट्रॉलीज विजेवर चालतात. आता विजेवर चालणाऱ्या बस आणि ट्रक या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करत असून, प्रायोगिक तत्त्वावर मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस हाय-वेवर या बस आणि ट्रक चालविण्यात येणार आहेत. नवी दिल्ली-मुंबई दरम्यान तयार करण्यात आलेल्या नवीन एक्स्प्रेस हाय वेवर दोन्ही बाजूंच्या शेवटच्या रस्ता-लाइनवर या इलेक्ट्रिक लाइन टाकण्यात येणार आहेत. या प्रयोगावर काम करून तो किती अंशी यशस्वी होईल हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्यादृष्टीने या प्रस्तावाचा अभ्यास करण्यात येत आहे.
मार्ग सुरू झाल्यानंतर त्यावरून बसेसबरोबरच ट्रकही विजेवर धावू शकतील. या बस एकत्र जोडलेल्या असतील. या नवीन एक्स्प्रेस हाय-वेवरून धावताना दिल्ली – जयपूर – अलवर – सवाई माधोपूर – वडोदरा असा त्यांचा मार्ग असेल. हा प्रयोग यशस्वी झाला, तर यामुळे वाहतुकीचा खोळंबाही कमी होईल, इंधनबचत होईल, शिवाय देशातील प्रदूषण कमी होण्यासही हातभार लागेल.